मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळात राज्यातील जनता होरपळत असून, यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सात जून २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.
या वेळी त्यांच्यासमवेत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, इंदापूरचे आमदार दत्ता बारणे उपस्थित होते. बारामती तालुका हा दुष्काळी असून, शरद पवार आणि अजित पवार यांनी गेले दोन दिवस या दुष्काळी भागाचा दौरा केला. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बारामतीसह राज्यात भीषण पाणीटंचाई व दुष्काळाचा सामना राज्यातील जनता करत आहे. या सगळ्या शेतकर्यांच्या समस्या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी बारामतीमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत १०० जागांची पहिली बॅच ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सांगितले. दुष्काळाविषयी चर्चा करताना त्याबाबतचे काही मुद्दे उपस्थित केले. हिरवा चारा येत नाही तोपर्यंत जनावरांच्या छावण्या बंद करू नका, टँकर पाणीपुरवठा कमी होत आहे, त्याबाबत सरकारने नियोजन करण्याची मागणी या वेळी केल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, ‘बारामती पाण्याच्या संदर्भात ही बातम्या आल्या; पण आमची भूमिका ही आहे की, दुष्काळात असे वाद पुढे आणू नये. पाण्याची पळवापळवी झालेली नाही, कुणीही कुणाचे पाणी पळवले नाही, सध्या कुठल्याच धरणात पाणी नाही, ऑक्टोबरमध्ये नवीन सरकार येईल त्यावेळीचा हा प्रश्न आहे, कालवा सल्लागार समिती बसते त्यातून हे निर्णय होतात, जे वाटप झाले आहे तसे पाणी मिळणार, अशी स्पष्ट भूमिका मांडली.’
या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचे आमदार जाणार नाहीत. त्यामुळे या विधानाला काडीचाही आधार नसल्याचे आणि दावा धादांत खोटा असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.